*स्वामी रामानंद तीर्थ*
*ऊर्फ*
*व्यंकटेश भगवानराव खेडगीकर*
*जन्म : ३ ऑक्टोबर १९०३*
(सिंदगी, विजापूर)
*मृत्यू : २२ जानेवारी १९७२*
(हैद्राबाद)
चळवळ : हैदराबाद मुक्तिसंग्राम
पत्रकारिता/ लेखन: व्हिजन
साप्ताहिक
धर्म : हिंदू
वडील : भगवानराव खेडगीकर
स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते.
इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.
🔮 *हैदराबाद मुक्तिसंग्राम*
हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.
‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.
तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.
लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.
*स्मृती*
एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
स्वामींच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड येथील विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले आहे.
व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे अंबाजोगाई येथे चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असे नाव दिले आहे.
उस्मानाबाद येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏