मनोविकारतज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज सकाळी कर्करोगाने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सविता आणि मुलगा कबीर असे कुटुंब आहे. नाडकर्णी यांच्या निधनाने ध्येयनिष्ठा, सेवाभाव, कल्पकता आणि संघभावनेतून कार्य करणारा मानसशास्त्र क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना महिनाभरापूर्वी स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्यांच्यावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यांची प्रकृती उपचारांना साथही देत होती. मात्र आज सकाळी अचानक त्यांचा रक्तदाब वाढला. त्यातच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. नाडकर्णी यांचे प्रारंभिक शिक्षण जळगाव, आंबेजोगाई, ठाणे अशा विविध ठिकाणी झाले. ठाणे कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन त्यांनी जी. एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि केईएम रुग्णालयातून 'डिप्लोमा इन सायकॉलॉजी मेडिसीन' पदविका आणि एमडी (मनोविकारशास्त्र) ही पदवी घेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. एमडीच्या परीक्षेत ते मुंबई विद्यापीठाच्या सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्यांनी काही काळ केईएम रुग्णालयात अध्यापनाचे कामही केले
.मुक्तांगणाची स्थापना
1980 च्या दशकात 'गर्द' या अमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांवर उपचार करून डॉ. नाडकर्णी यांनी शेकडो तरुणांना अमली व्यसनातून बाहेर काढले. या तरुणांच्या सहभागातूनच त्यांनी 'मुक्तांगण' हे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र स्थापन केले. या त्यांच्या कार्याचा प्रवास लक्षवेधी होता.
पुस्तकांना शासनाचे पुरस्कार
त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषाद योग' या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले होते. 'रंग माझा वेगळा' व 'आम्ही सारे' ही त्यांची व्यावसायिक नाटकेही गाजली.
सरस्वती विद्यामंदिर येथे अंत्यदर्शन
डॉ. नाडकर्णी यांचे पार्थिव नौपाडा येथील सरस्वती विद्यामंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच नाडकर्णी यांच्या संस्थांमधील स्वयंसेवकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. जवाहरबाग येथील वैकुंठभूमीत त्यांचे पुत्र कबील यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी डॉ. नाडकर्णी यांच्या शेकडो चाहत्यांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.


